TOD Marathi

CM Eknath Shinde On Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं आरोप-प्रत्यारोप सुरु असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्याचं खापर आता महाविकास आघाडीवर फोडलं आहे. गेली दोन वर्षे कंपनीला जो प्रतिसाद मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीकडे बोट दाखवलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यासंदर्भात मंगळवारी शिंदे गटाची बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्पाच्या मुद्द्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी या संपूर्ण प्रकरणाचं खापर महाविकास आघाडीच्या डोक्यावर फोडलं.

“आम्हाला तर दोनच महिने झाले आहेत. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता कंपनीच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली होती. सरकार त्यांना प्रकल्पासाठी जी काही मदत हवी ती देईल, असं बोलणं झालं होतं. त्यानंतर तळेगावमध्ये जवळपास अकराशे एकर जमीनदेखील आम्ही देऊ केली होती.” “पण गेल्या दोन वर्षांत वेदांता कंपनीला ज्याप्रकारे रिस्पॉन्स मिळायला हवा होता, तो कमी पडला असावा. आता याबाबत केंद्र सरकार आणि अग्रवाल हे कंपनीच्या मालकांसोबत बातचीत करणार आहेत. तो प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करू.” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन महाविकास आघाडी आणि शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1 लाख नोकऱ्या उपलब्ध होऊ शकणारा सेमिकंडक्टर्सचा हा प्रकल्प अखेरच्या क्षणी गुजरातला गेला. त्यावरून मंगळवारी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र याचं खापर महाविकास आघाडीवरच फोडलं आहे. या प्रकल्पासाठी महाविकास आघाडी सरकारनं प्रयत्न केले होते, असा दावा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काल फोनवरुन चर्चा झाल्याचीही माहिती आहे. फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला गेल्यानं शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांनी जोरदार हल्ला चढवला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यातील चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. या चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काय आश्वासन दिलंय हे मात्र अजुन गुलदस्त्यात आहे.